एआयईईई मधील गोंधळ कमी होणार ?
अखिल भारतीय अभियांत्रिकी परीक्षेसाठी (एआयईईई) बसलेल्या राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांना महाराष्ट्राबाहेरच्या राज्यांतील परीक्षा केंद्र मिळाल्याने गेल्या वर्षी या विद्यार्थ्यांची ससेहोलपट झाली होती. यावर्षी मात्र या प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डी. पुरंदरेश्वरी यांनी दिली. परीक्षा केंद्र वाढविण्याबाबतही विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या २६ एप्रिल २००९ रोजी ही परीक्षा घेण्यात येत आहे. गेल्या वर्षी एआयईईई परीक्षेला बसलेल्या पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील अन्य काही ठिकाणच्या विद्यार्थ्यांना अहमदाबाद, भोपाळ, पोर्ट ब्लेअर ही परीक्षा केंद्रे देण्यात आली होती. लोकसत्ता या वृत्तपत्राने या विषयी जोरदार बातम्या लिहिल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी खास रेल्वे गाड्या सोडाव्या लागल्या होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनेही मुंबईतील तंत्रशिक्षण संचालनालयासमोर आंदोलन केले होते. एआयईईईच्या या गोंधळामुळे केंद्रातील मराठी मंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. २६ एप्रिल रोजी राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक आणि अमरावती अशा सात केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी "एआयईईई'च्या www.aieee.nic.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एनआयटी) वीस संस्थांसह, आयआयआयटी, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळतो. राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने अभियांत्रिकीसाठी राबविण्यात येणा-या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत एआयईईईच्या विद्यार्थ्यांसाठी १५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. काही वर्षांपर्यंत ही परीक्षा मंहाराष्ट्रातील खूप कमी विद्यार्थी द्यायचे. त्यामुळे परराज्यातील विद्यार्थी या १५ टक्के राखीव जागांच्या माध्यामातून राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावायचे. मात्र गेल्या शैक्षणिक वर्षापासून एआयईईई देणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील ४२ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. बरेच विद्यार्थी राज्यातील सीईटी व एआयईईई या दोन्ही परीक्षा देतात. पण ज्या परीक्षेत अधिक गुण आहेत, त्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना चांगली महाविद्यालये मिळू शकली आहेत.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा